बारामती : रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन देऊनही खड्डे बुजविले जात नाहीत, या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे.
बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा खड्डे दाखवून दिले होते. पण जे जनतेला दिसते ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करीत विचारला आहे.
बोपदेव घाटातील खड्डे आपल्या यंत्रणांना दिसत नाहीत काय, असे विचारत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय का, असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो, येथे भविष्यात अपघात होऊन कोणी दगावले तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या द्वारे दिला आहे.
http://www.sarkarnama.in/supriya-sule-target-cm-fadanvice-pitch-28780